Home » , , , » शिक्षण पद्धतीत बदलासाठी सरकार पावले उचलणार - विनोद तावडे

शिक्षण पद्धतीत बदलासाठी सरकार पावले उचलणार - विनोद तावडे

Written By . on Thursday, 26 November 2015 | 02:40

मुंबई : राज्याच्या शिक्षणपद्धतीत गरजेनुसार सकारात्मक बदल करणे आवश्यक असून यादृष्टीने शासनाकडून निश्चितच पावले उचलली जातील. तसेच शिक्षकांवरील शिकवण्याव्यतिरिक्त असलेल्या कामाचा भार कमी करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त “सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने” या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस आमदार हेमंत टकले, आमदार रामनाथ मोते, शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील, शालेय विकास मंचाचे डॉ. वसंत काळपांडे, बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, विलास कांबळे, शुभदा चौकर, माधव सूर्यवंशी, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, शिक्षकांची भूमिका विविधांगी असते. शिक्षकांचे वेळोवेळी प्रशिक्षण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. भौतिक सुविधा देण्यासह अध्ययन-अध्यापन या प्रक्रिया सोप्या केल्यास शिक्षक अधिक चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ताही उंचावेल. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता, विचारप्रक्रिया, जिज्ञासा, जाणिवा, प्रयोगशीलता जागृत करण्यासाठी कृतियुक्त, बालस्नेही, आनंददायी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची चर्चा होणे आवश्यक आहे. शाळांनाही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपली पारंपरिक चाकोरी सोडून बदलांसाठी सज्ज व्हावे लागणार आहे.

गृह आणि शिक्षण या दोन विभागांना शासन प्राधान्य देणार असल्याचे सांगून श्री. तावडे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करु नये आणि विद्यार्थ्यांना काळाशी सुसंगत असे चांगले शिक्षण द्यावे. आपण ‘स्वच्छ भारत अभियान’ देशभरात आणि राज्यात राबवित आहोत. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे असणे ही आमची प्राथमिकता असणार आहे. माझ्यासाठी ‘मास एज्युकेशन’ महत्त्वाचे आहे, कारण यामध्ये मानव विकास, मानवी शक्ती आणि सकारात्मक विचार एकत्र येतात. त्यामुळे ही साखळी आधिक कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

श्री. टकले म्हणाले, आज अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. असे असले तरी उत्तमोत्तम विद्यार्थी घडविणे ही शिक्षकांचीच जबाबदारी आहे. शिक्षकांनी सुद्धा कौशल्य विकासाबरोबर चौकटीबाहेरचा विचार करीत मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत.

शिक्षण मंत्री श्री. तावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक संकेतस्थळ पुरस्कार बालाजी जाधव यांना, उत्कृष्ट ई लर्निंग पुरस्कार शमशुद्दीन आत्तार, डॉ. कुमुद बन्सल शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार राजेश कोगदे, तर डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांना देण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या “वाटचाल ई शिक्षणाची” या मुंबई शिक्षण विकास मंचाच्या पुस्तकाचे प्रकाशनही श्री. तावडे यांच्या हस्ते झाले.
SHARE

About .

0 comments :

Post a Comment